८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा ? राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल
मुंबई – मालवण मध्ये ८ महिन्यनपूर्वी उभारलेला आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे . काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकारवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे तर हा पुतळा कोसळलाच कसा असा सवाल राज ठाकरेंनी केला .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवण समुद्र किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज ठाकरे यांनी एका ट्विटद्वारे या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच ज्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? असा सवालही उपस्थित केला आहे
राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?
मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ?
