ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पदक कांस्य, पण मनुने रचला सोनेरी इतिहास

जो आनंद चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँगच्या चेहर्‍यावर होता, जे आनंदाश्रू सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणार्‍या तेनसिंग शेर्पाच्या डोळ्यात होते, त्याच भावना आज मनु भाकरच्या देहबोलीत दिसल्या. तिच्या पाणावलेल्या कडा सारं काही सांगून गेल्या. हिंदुस्थानी ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला म्हणून मनुने पराक्रम केला. पदक कांस्य असले तरी तिने आज इतिहासाचे सोनेरी पान कोरले. तिचे हे पदक तमाम हिंदुस्थानींना एकत्र आणणारे रामबाण ठरले. पदक पॅरिसमध्ये जिंकले असले तरी तिच्या पदकशौर्याने १४० कोटी हिंदुस्थानींची छाती अभिमानाने फुगली.

खरं सांगायचं तर मनु इतिहास रचणारच होती. कारण पॅरिस ऑलिम्पिकचे सर्वांचे एकच ध्येय आहे. आयफेलवर चढाई करत पदकांचा टॉवर उभारणे. फक्त आपल्या मनु भाकरने ती चढाई सर्वप्रथम केली एवढंच. आता बाकीचेही करायला सुरुवात करतील. मनु जिंकली नाही तर विक्रमांसह जिंकली. १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य जिंकले. ही तर सुुरुवात आहे. पण आरंभ है प्रचंड, असे म्हणावे लागेल. पुढे आपले ऑलिम्पिकवीर त्याच्यावर पदकांचा एकेक मजला चढवतील. ही आशा नव्हे विश्वास आहे. अतिआत्मविश्वास तर मुळीच नाही. आपले वीर इथे पॅरिसमध्ये वीरता दाखवण्यासाठी आलेत. खाली हाथ आए थे हम, खाली हाथ जाएंगे, हे शब्द कधीच इतिहासजमा झालेय. आता फक्त पदकांची लूट करायचीय.
एक काळ असा होता की आपण एकेका पदकासाठी आसुसलेले असायचो. पदकांचा दुष्काळ आपल्या पाचवीलाच पुजलेला असायचा. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवांनी ५७ किलो वजनी प्रिâस्टाइल कुस्तीत वैयक्तिक कांस्य जिंकले. त्यानंतर वैयक्तिक कांस्य जिंकण्यासाठी ४२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. यादरम्यान केवळ हॉकीचा संघ कधी सोनं, कधी चांदी आणि कधी कांस्य जिंकला. फक्त १९७६ साली आपल्याला एकही पदक जिंकता आले नव्हते. म्हणजेच ऑलिम्पिक इतिहासात १९५२ सालीच हिंदुस्थानला दोन पदकांचे भाग्य लाभले.
खाशाबांनी केलेल्या पदकपराक्रमाची बरोबरी करण्यासाठी लिएंडर पेसला १९९६ सालाची वाट पाहावी लागली. गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये (१९८४, १९८८ आणि १९९२) हिंदुस्थानी खेळाडू हात हलवतच परतत होते. आपल्या १०० कोटी लोकसंख्येच्या हिंदुस्थानसाठी ही फारच लाजीरवाणी बाब असायची. पण आता काळ बदललाय आणि वेळही. हिंदुस्थानच्या पदकांना पेस (वेग) दिला तो लिएंडरनेच. अटलांटात टेनिसचे कांस्य जिंकल्यापासून हिंदुस्थानी पथक रिकाम्या हाताने परतत नसले तरी केवळ एकच पदक जिंकत होते. हे अपमानास्पदच होते. आपल्याकडे गुणवत्ता होती, पण ती ऑलिम्पिकच्या स्टेजवर गळपटायची. आपले खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्रही होत नव्हते. पण २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकने हिंदुस्थानी खेळाडूंवर अशी काही जादू केली की माहौलच बदलत गेला. सर्वात आधी अभिनव बिंद्राने हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक सुवर्ण जिंकून दिले. १०८ वर्षांनी का होईना आपला खेळाडू वैयक्तिक स्पर्धेत गोल्डन बॉय ठरला. मग विजेंदर सिंगने मुष्टियुद्धात तर सुशील कुमारने कुस्तीत यशाचा झेंडा रोवत हिंदुस्थानच्या कामगिरीला रुपेरी झळाळी दिली. १०८ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात आपण प्रथम तीन पदके जिंकलो. २००८ ने पेरलेल्या यशाच्या बीजांचे २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रोप झाले. आपला पदकांचा आकडा सहावर पोहोचला. २०१६ साली आपण पुन्हा घसरलो. चक्क अपेक्षाभंग झाला. केवळ पी.व्ही.सिंधू आणि साक्षी मलिकने या महिला खेळाडूंनी लाज राखली. पण २०१६ चे अपयश टोकियो ऑलिम्पिकमध्ये धुवून काढताना सेव्हन स्टार कामगिरी केली. नीरज चोप्राचा सुवर्णभाला संस्मरणीय ठरला.
टोकियोच्या यशाने हिंदुस्थानला जगात ओळख मिळवून दिलीय. आपण प्रथमच पहिल्या पन्नास देशांत पोहोचलो. तेव्हापासून गेल्या तीन वर्षात हिंदुस्थानच्या नेमबाज, कुस्तीवीर, अ‍ॅथलीट, मुष्टियुद्ध, बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त यश मिळवत पॅरिस गाजवण्याचे संकेत दिलेच होती. आता ते प्रत्यक्षात साकारलं जाणार इतकंच.
मनुने ती सुरुवात केलीय. स्पर्धेच्या दुसर्‍याच दिवशी मनुने कांस्य जिंकण्याचा पराक्रम करत तमाम हिंदुस्थानींना गोड बातमी दिलीय. पुढच्या प्रकारात मनुकडून सोनेरी अपेक्षा असेल. विजयानंतर जरी ती म्हणाली असेल, कर्म कर फल की चिंता मत कर. मी तर म्हणेन फळाची चव चाखण्यासाठीच कर्म कर. ध्येय हे पदकाचेच असायला हवे. प्रतिस्पर्ध्यापेक्षा  वरचढ लक्ष्य कसे गाठायचे, याचीही चिंता असायलाच हवी. या पदकानिशी नेमबाजीत पदक जिंकणारी मनु पहिली खेळाडू ठरलीय. आतापर्यंत राज्यवर्धन राठोडपासून अभिनव बिंद्रा, विजय कुमार, गगन नारंग या चौघांनी पदके जिंकली होती. आता त्यात मनु पहिली महिला असेल. दुसर्‍याच दिवशी १४० कोटी हिंदुस्थानींची छाती अभिमानाने फुगलीय. हे क्षण आता वारंवार अनुभवायला मिळणार आहेत. आयफेलवर चढाई सुरु झालीय. पदकांचा टॉवर उभारला जाणार. पुढचे दोन आठवडे विक्रमांचेच असतील. हिंदुस्थानच्या क्रीडा पराक्रमांचे असतील. हिंदुस्थानने क्रिकेटचा टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर जो आनंद झाला होता, तोच आनंद ऑलिम्पिकवीर हिंदुस्थानींना पुन्हा देणार आहेत. जणू क्रीडाविश्वाच्या आनंदोत्सवाचा दिवाळीसण सुरू झालाय. आता होऊ दे जल्लोष.

मंगेश वरवडेकर*

error: Content is protected !!